Home नागपुर दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप

दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप

10

भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी – ॲड. चंद्रशेखर बरेठिया
दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप


सावनेर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने देशात देशात लोकशाही प्रस्थापित झाली. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक व व्यक्तिस्वातंत्र्य असणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करून अखंड भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारी भारतीय राज्यघटनेवर जर कोणी आच आणत असेल तर त्या राज्यघटनेचा संरक्षण करणे ही तुमची आमची जबाबदारी आहे असे रोखठोक प्रतिपादन एडवोकेट चंद्रशेखर बरेठिया यांनी केले.
स्थानिक पंचशील बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि नवयुवक मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय भीम जयंती उत्सवाच्या समारोपिये कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले. ज्या संविधानात देशाचा इंडिया दॅट इज भारत असा स्पष्ट उल्लेख असताना आज संपूर्ण देशात प्रसार माध्यमांपासून तर राजकीय लोकांच्या मुखातून हिंदुस्तान-हिंदुस्तान असा उल्लेख केला जातो ही बाब चिड आणणारी व निंदनीय आहे. विविध धर्मांनी नटलेला आपल्या या देशामध्ये एका विशिष्ट धर्माचा देशासाठी उल्लेख करणे म्हणजे पर्यायाने संविधानाचे खच्चीकरण करणे होय. आज देशात शैक्षणिक अनास्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न असे अनेक महत्त्वाचे जिव्हाळ्याचे विषय असताना धर्मा- धर्मात तेढ निर्माण करून सामान्य लोकांना, तरुणांना, बेरोजगारांना त्यामध्ये व्यस्त ठेवून संविधानाचा मूळ गाभा हळूहळू नष्ट करण्याचा कट देशात सुरू आहे त्यामुळे वेळीच सावध होऊन संविधानाचे रक्षण करणे ही तुमची आमची जबाबदारी आहे असे परखड मत त्यांनी आपल्या प्रमुख अतिथी मार्गदर्शनातून व्यक्त केले.


प्रभागाचे युवा नेतृत्व राजेंद्र उर्फ बाल्या नारनवरे यांच्या पुढाकाराने व सुधाकर गजभिये यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 व 15 एप्रिल या दोन दिवसात मोठ्या उत्साहात भीम जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भदंत शीलरक्षित महाथेरो यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना झाली त्यानंतर भव्य महारैलीचे सावनेर नगरीत आयोजन करण्यात आले. दि 15 एप्रिलला तनिष्क होमिओपॅथिक क्लिनिक, शुभ पॅथॉलॉजी लॅब, सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील 41 तरुणांनी रक्तदान केले. सायंकाळी समारोपीय कार्यक्रम व भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंतशीलरक्षित महाथेरो तर ॲड. शैलेश जैन, रामराव मोवाडे, उत्तम कापसे, ॲड. शामराव गोंडूळे, डॉक्टर मरफी गजभिये, राज पाटील, प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र नारनवरे संचालन सुधाकर गजभिये तर आभार प्रदर्शन राजेंद्र चवडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुरेश हनवते, दीपक गवळी, शरद नारनवरे, जगदीश नरनवरे, दामोदर बावणे, राहुल नानवटकर, शुभम गौरखेडे, डॉ. प्रशांत गजभिये, यांनी परीश्रम घेतले. यावेळी प्रभागातील चिमुकल्या बालकलाकारांनी भीम गीतावर सुंदर नृत्य सादर करून लोकांची मने जिंकले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक, उपासिका आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी दोन हजार नागरिकांना भोजनदान करण्यात आले.